विकसीत भारत कृषी संकल्प अभियान
पालघर : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार ( Ministry of Agriculture and Farmers’ Welfare, Government of India ) द्वारा संपूर्ण भारत देशात केंद्रीय कृषी मंत्री ( Union Agriculture Minister ) शिवराजसिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan ) यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून २९ ते १२ जून या कालावधीत खरीप हंगामपूर्व विकसित कृषी संकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात देखील या अभियानाला सुरुवात झाली आहे.
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद आटारी पुणे यांच्या सूचनेनुसार कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल ( Krishi Vigyan Kendra Kosbad Hill ) च्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात हे विकसित कृषी संकल्प अभियान ( Viksit Krishi Sankalp Abhiyan ) राबवलं जाणार आहे. ज्याचा शुभारंभ कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमातून झाला. यावेळी विविध विषयातील शास्त्रज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतीविषय मार्गदर्शन केलं.
गावोगावी जावून शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देणे, शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञाना विषयी जागरूकता मोहीम राबविणे हा या अभियाना मागचा उद्देश आहे.
कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हे विकसित कृषी संकल्प अभियान पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड, वाडा, वसई, जव्हार, मोखाडा या तालुक्यां मधल्या ९० गावांमध्ये राबवलं जाणार आहे. यासाठी एक कृषी रथ देखील तयार करण्यात आला आहे. ज्याच्या माध्यमातून भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे केंद्रीय मत्स्य विज्ञान संस्था मुंबई इथले शास्त्रज्ञ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, आत्मा व कृषी विभाग पालघर, महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अधिकारी तसचं गाव पातळीवर ग्रामसेवक हे गावागावां मध्ये जाऊन, शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत जाऊन त्यांना शेती विषयक मार्गदर्शन करणार आहेत.