लाभ मिळवण्यासाठी रेशनकार्ड अपडेट करणे आवश्यक
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या शेवटच्या घटकांपर्यंत आयुष्मान भारत मिशन अंतर्गत योजनेचा लाभ मिळावा, जिल्हयातला एकही घटक आरोग्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नशील रहावं असं आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केलं. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पालघर मध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार हेमंत सवरा, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी, जिल्हा रूग्णालय, शासकीय रूग्णालय, खाजगी रूग्णालयांचे प्रमुख आदी या आढावा बैठकीत उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या तसचं राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ जिल्ह्यातल्या सर्व स्तरातील घटकांना, नागरीकांना मिळावा यासाठी “विकसित भारत संकल्प यात्रा २०२४” अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठक डॉ. शेटे यांनी घेतली.
यावेळी डॉ. शेटे यांनी जिल्हयातील सध्या स्थितीची माहिती जाणून घेतली. यामध्ये आयुष्यमान भारत अंतर्गत देण्यात येणारे ओळखपत्र अधिकाधिक लोकांना मिळावे, यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यातंर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरीकांना या योजनेचा लाभ मिळवा, यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. या जिल्हयातला एकही घटक आरोग्यापासून वंचित राहणार नाही तसचं आरोग्याच्या बाबतीत शासन कुठेही कमी पडणार नाही, जिल्हयातल्या जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी स्वत: लक्ष देणार ही असं ही ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासनाच्या यादीवर असणाऱ्या ठराविक खाजगी रूग्णालयात रूग्णांवर इलाज केला जातो. मात्र, तिथले पॅकेज आणि उपचार पध्दती वाढल्याने रुग्ण उपचार घेण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे संबंधित घटकाच्या खिशाला कोणत्याही प्रकारची झळ बसणार नाही. त्यासाठी ही योजना तत्पर अधिकाधिक वाढवावी, पैशां अभावी कोणत्याही घटकाचा मृत्यू होऊ नये असे निर्देश सर्व शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांना आपण दिले असल्याचं डॉ.शेटे यांनी सांगितलं.