शेतीसाठी सात लाखांपेक्षा ही जास्त अनुदान
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या आदिवासी पाड्यांवर 50 लाख बांबू वृक्ष लागवडीचा ( Bamboo Farming ) संकल्प प्रत्यक्ष बांबू वृक्ष लागवडीतून करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात बांबू लागवडीला वाव असून या माध्यमातून जिल्ह्यातलं स्थलांतर रोखण्यास मदत होऊ शकेल असं मत राज्य कृषी मूल्य आयोग ( Chairman of the State Agricultural Prices Commission ) व कार्यकारी मुख्यमंत्री पर्यावरण, शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल ( Pasha Patel ) यांनी व्यक्त केलं. त्यांनी डहाणू मध्ये बांबू वृक्ष लागवडीचा ( Bamboo Tree Plantation ) शुभारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन बांबू लागवडीतून आपलं जीवन बदलावं असं प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं. धानिवरी गावाने मिळालेल्या 50 हेक्टर सामूहिक वनपट्ट्यांमध्ये बांबू लागवड करण्याचा निर्णय घेतल्या बद्दल त्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले.
न परवडणाऱ्या भात शेतीपेक्षा 7 लाख 4 हजार रुपयांचं अनुदान घेऊन केलेली बांबू शेती आदिवासींचे आणि शेतकऱ्यांचे जीवन बदलेल, वातावरण बदलाचे संकट रोखण्यासाठी बांबू महत्त्वाचा असून यातून सर्वाधिक ऑक्सिजनची निर्मिती आणि कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून घेण्याची क्षमता आहे. बांबू लागवडीसाठी खड्डे, रोपे, देखभालीचा खर्च सर्व शासन स्तरावरून अनुदानाच्या रूपाने शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे धानिवरी गावाने सहकार्य दाखवून 1 हजार बांबू उत्पादक शेतकरी उभे केल्यास आपण केंद्राच्या योजनेतून बांबूचे युनिट याच गावात उभे करू ज्यातून स्वयंरोजगाराच्या संधी गावातच निर्माण केल्या जातील असं आश्वासन ही यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्थानिकांना दिलं.