पालघर : शासनाच्या आत्मा योजने अंतर्गत सेंद्रिय शेती करण्याचं प्रशिक्षण घेवून लाभार्थी कुणाल जितेंद्र माळी यांनी आता आपल्या वडिलोपार्जित चिकू या फळाच्या शेतीतून चांगल आणि दर्जेदार उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे.
सुरवातीला माळी हे शिक्षण घेवुन डहाणुच्या एका कंपनीत नोकरी करत होते. तिथे दिवस रात्र कष्ट करून सुद्धा महिन्याला ५ हजार रूपये हातात येत होते. सहा महीने नोकरी केल्यानंतर वडिलांच्या सांगण्या वरून माळी आपल्या वडिलोपार्जित शेतीकड़े वळले गेले. कृषी क्षेत्राकडे वळल्यानंतर त्यांनी डहाणू तालुका कृषी विभागाकडून शेतीविषय अधिक माहिती समजून घेतली. त्यावेळेस त्यांना कृषी विभागाकडून शेतक-यांसाठी असलेल्या विविध योजनांविषयी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेचं आत्मा योजने अंतर्गत सेंद्रिय शेतीच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग करून मिळवतोय लाखोंचं उत्पन्न
त्यातून त्यांना लागोपाठ तीन वर्ष सेंद्रिय शेती कशी करायची याबाबतचं प्रशिक्षण दिल गेलं. त्यात गांडूळ ख़त निर्मिती, दशपर्नी अर्क, जीवामृत, एसनाईन कल्चर आदी कसं तयार करायचं, ते शेतीत किती प्रमाणात आणि कसं वापरायचं विषयीचं प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर माळी यांनी आपल्या शेतात ही सर्व ख़त तयार करायला सुरुवात केली. आणि मग सेंद्रिय पद्धतीने चिकूची शेती करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या चिकू फळाचा आकार कसा वाढेल याकड़े लक्ष द्यायला सुरुवात केली. कोसबाड कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञाकडून त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली. तसचं इतर ठिकाणी देखील प्रत्यक्ष भेटी देवून काय आणि कसं करावं याबाबतची माहिती घेतली.
सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे मातीचे आरोग्य, पाण्याची गुणवत्ता टिकून राहू लागली. त्यामुळे माळी यांच्या चिकू फळाची गुणवत्ता सुधारली. उत्तम प्रतीचा चिकू त्यांच्या बागेत तयार होवू लागला. ज्याला बाजारात देखील चांगला भाव मिळत आहे. त्याचबरोबर त्यांना कृषि विभागाकडून ड्रिप स्कीमचा देखील लाभ मिळाला. या योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानातून त्यांनी आपल्या चिकूच्या बागेत सर्वत्र झाडांना पाणी देण्यासाठी ड्रिप सिस्टम बसवून घेतली. ज्यामुळे झाडांना योग्य पद्धतीने आणि गरज असेल तेव्हा पाणी देता येतं. ड्रिप सिस्टममुळे पाणी आणि वीज या दोन्हींची बचत होत असल्याचं माळी सांगतात.
शासनाच्या शेतक-यांसाठी असलेल्या योजना या लाभकारक आहेत. या योजनांच्या लाभातून आज युवा शेतकरी कुणाल माळी हे उच्च प्रतीच्या चिकूचं उत्पादन घेवू लागले आहेत. यातून त्यांना वर्षाकाठी चांगला नफा मिळत असल्याचं ते सांगतात. आणि समाधान हि व्यक्त करतात.