पालघर : कॉलेज मधील विद्यार्थ्यांना शेतीतल्या नवनवीन प्रयोगांची माहिती व्हावी, व्यावसायिक शेती आणि शेती संबंधित व्यवसायांकडे विद्यार्थ्यांनी वळावे यासाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्रयोगशील शेतकऱ्यांशी संवादाचे आणि बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
ऑर्किड फुलांची शेती करणारे तसेच अॅवाकोडा फळांच्या झाडांची लागवड करणारे रामचंद्र सावे आणि भोपळी मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे राजेंद्र चुरी यांना या संवादासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मुलाखतकार सुहास राऊत यांनी शेतीविषयक अनेक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या मनातील जिज्ञासा पूर्ण केली.

प्रयोगशील शेतकऱ्यांशी संवाद
शास्त्राचा अभ्यास, उत्तम आकलन आणि चुकांचा सूक्ष्म अभ्यास केला की आपल्या स्वप्नात नसलेले यश देखील आपल्याला प्राप्त होते, असे प्रतिपादन यावेळी रामचंद्र सावे यांनी केले. ऑर्किड फुलांचे टिशू, नारळाच्या सालांवर केलेली अधांतरी लागवड, शेडनेटमध्ये केलेले त्यांचे संगोपन, त्यांना दिले जाणारे फिल्टर पाणी, त्यांची मागणी आणि विक्री ही सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवली. आज अन्य राज्यातून, देशातून हे तंत्रज्ञान पाहायला अनेक शेतकरी आपल्याकडे येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ॲवाकोडा लागवडीची विशेष माहिती त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना सांगितली. जगभरातल्या अनेक देशांना दिलेल्या भेटींचे अनुभव देखील त्यांनी सांगितले.
‘तुम्ही झाडांच्या सानिध्यात राहू लागला की झाड तुम्हाला मला काय हवं नको ते सगळे सांगते.’ अशा काव्यात्म विधानाने राजेंद्र चुरी यांनी संवादाला सुरुवात केली. भोपळी मिरची उत्पादनाचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांना उलगडून सांगितला. आम्ही मेहनतीने शेतकऱ्याची प्रतिमा बदलली. उत्तम तंत्रज्ञान आणि अभ्यासाच्या जोरावर शेतकरी सधन होऊ शकतो, हे दाखवून दिले. पालघर परिसरातील किमान दहा शेतकरी भारताचे रोल मॉडेल होऊ शकतील असे प्रतिपादन राजेंद्र चुरी यांनी केले. शेतकऱ्यांना सरकारकडून जीएसटी नंबर मिळाला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी व्यक्त केली.
देशी वाण टिकावेत म्हणून दांडेकर महाविद्यालयात या बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात पंचवीस स्टॉलवर अनेक पारंपरिक बियाणी ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी या निमित्ताने परसबाग स्पर्धा जाहीर करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.