पालघर : गाव पातळीवरील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. पालघर जिल्हयात होणारी ही कार्यशाळा महाराष्ट्रातली पहिली कार्यशाळा आहे. याचा मला आनंद होत आहे, असं प्रतिपादन गृह (ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केलं. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातल्या पोलीस पाटीलांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी पालघर जिल्ह्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या जिल्हा पोलीस कारागृहाच्या बांधकामाची देखील पाहणी करून सविस्तर माहिती घेतली.
या कार्यशाळेला संबोधित करताना भोयर म्हणाले की, पोलीस पाटील हा गावपातळीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतो. मागच्या अनेक वर्षापासून पोलीस पाटील हे तुटपुंज्या 2 हजार ते 3 हजार मानधनावर काम करत होते. मात्र पोलीस पाटील हा गावपातळीवर काम करणारा कार्यकर्ता असल्याने मुख्यमंत्री यांनी आता त्यांच्या मानधनात वाढ केली आहे. आता त्यांना 15 हजार रुपये एवढं मानधन दिलं जातं. तसचं गेल्या काही वर्षापासून पोलीस पाटील यांची अनेक पदं रिक्त होती. त्यानंतर तत्काळ 282 रिक्त पदं भरण्यात आली आहेत. उर्वरित रिक्त पदं लवकरच भरण्यात येतील असं यावेळी त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, आताच्या काळात प्रत्येक क्षेत्र हे डिजीटल होत आहे. मग पोलीस पाटील यांना सुध्दा डिजीटल होणं आवश्यक आहे. आता या क्षेत्रात महिला पोलीस पाटील सुध्दा काम करत असून त्या आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेत, याचा मला आनंद आहे. पालघरच्या धर्तीवर अशी कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात येईल. पोलीस पाटील हे पद महत्वाचं असल्याने पोलीस पाटील यांनी आपल्या पदाची कर्तव्य जबाबदारीने पार पाडावीत असं आवाहन यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी उपस्थित पोलिस पाटील यांना केलं.